....
'अशक्य' हा शब्द ज्यांच्या जवळ नसतो तेच विजेते होतात..... उराशी बाळगलेले मोठे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने ते धावत असतात.... कमालीचे दारिद्र, त्यांना रोखत नाही ... ते धावतात एका ध्यासाने एका ध्येयाकडे ......आणि एक दिवस तो विजयाचा आनंद त्यांच्या कवेत येतो. .....अशाच एका जिद्दी तरुणाची हि कहाणी........ मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विष्णू रामदास थिटे या तरुणाने दहावीत असताना आपण दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा उधोजक होऊ दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण इतर लोकांना नोकरी देऊ असे स्वप्न पहिले. .. आणि जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन करत आज ते स्वप्न 'लोकनेता ट्रक्टर नांगर कारखाना' या स्वरुपात साकार झाले आहे. विष्णू थिटे याने किमान २५ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
असे स्वप्न पाहताना आपण अनेकदा वास्तवाचा विचार करतो पण अश्यक्य वाटणारे हे स्वप्न पाहताना विष्णू थिटे यांनी आपल्या दारिद्र्याचा विचार केला नाही. घरची प्रचंड गरिबी. आई वडील दोघेही शेत मजूर, झोपडीत राहणारा विष्णू मात्र आपल्या मनाला मोठा 'उधोजक' बनणार असे ठामपणे सांगत असे. विष्णूला दोन भाऊ एक ब्रह्मदेव आणि दुसरा महेश. ब्रह्मदेव गंरेज मध्ये काम करत असे तर महेश शिक्षण घेत होता. विष्णू ने दहावी नंतर सोलापूर येथील आय.टी.आय मध्ये सुतार कामाचा ट्रेड पूर्ण केला. हा आय टी आय पूर्ण करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. जेवणासाठी पैसे नसत त्यावेळी घरून सहा दिवसाच्या गुळाच्या पोळ्या करून तो आपल्या बरोबर घेऊन यायचा. शिक्षण पूर्ण करत असताना गरिबीमुळे अनेक चटके सहन करावे लागत होते. आई वडील शेतात काम करत असत पण तेवढ्या पैश्यात घरचे भागत नसे. विष्णू ने एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आय. टी. आय मध्ये असताना तो उधोगाचा विचार करू लागला होता. आपला एखादा उधोग असावा असे त्याला वाटू लागले. पण उधोग करण्यासाठी जागा, मशिनरी, भांडवल लागते आणि त्यासाठी आपल्याजवळ एवढा पैसा नाही याचीही जाणीव विष्णूला होत असे. पण हे सारे असताना तो उधोजक होण्याची स्वप्ने पाहत होता. ती साकार करण्यासाठी तो काही नियोजनही करत असे पण पैश्याचे सोंग घेता येत नाही हे तो विसरत नसे.
एक वर्षानंतर तो घरी आला. सुतार कामापेक्षा दुसरा काही उधोग करता येईल का असा विचार त्याच्या मनात येत होता. एक दिवस वडिलांनी आपल्या बरोबर त्याला शेतीच्या कामावर नेले. शेतातील कामानंतर त्याला जाणीव झाली कि दुसऱ्याची गुलामी आपणाला करायची नाही. आणि त्याने पुण्यातील राजगुरू नगर येथे जाऊन एखादा नवीन उधोग शिकण्याचा निर्णय घेतला. वडिलांना त्याने आपला निर्णय सांगितला काही पर्याय नसल्याने वडिलांनी होकार दिला. विष्णू पुण्याला गेला. एका वेल्डिंग वर्कशॉप हेल्पर म्हणून तो काम करू लागला. विष्णूचे मन त्याला गप्प बसू देत नव्हते. वेल्डिंग चे काम शिकण्याची त्याने सुरुवात केली. हळू हळू त्याला वेल्डिंग काम जमू लागले. विष्णूला त्या ठिकाणी पगार मिळत नव्हता फक्त जेवणावर त्याने आपले शिक्षण सुरु केले. कोणताही गुरु नसताना एकलव्य प्रमाणे त्याने आपली विद्या घेण्यास सुरुवात केली. त्याची उधोजक बनण्याची साधना सुरु झाली होती. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्याला इतर लोकही मदत करू लागले. त्याच्या काम शिकण्याची धडपड पाहून सर्व कामगार अचंबित होत.
एक ते दीड वर्षाचा कालावधी गेला. विष्णूला वेल्डिंग उधोगाची माहिती झाली. पण दुर्दैवाने तो ज्या ठिकाणी काम करत होता तो उधोग बंद झाला. विष्णू घरी आला. पुन्हा दुसऱ्याचा शेतावर काम करावे लागेल. पुन्हा ती गुलामी या विचाराने विष्णू विषन्न झाला. अचानक एक दिवस त्याने राहिलेली वेल्डिंग काम कोल्हापूर येथील अम आय डी सी येथे जाऊन चांगल्या वर्क शॉप मध्ये घ्यायची असे त्याने ठरिवले. पण नात्याचे अथवा जवळचे असे कुणीही कोल्हापूर येथे नव्हते. तरीही उधोगासाठी जायचेच असे पक्के ठरवून विष्णू ने लागणारी कपडे, भाकरीचे पीठ, स्टोव्ह, असे सामान घेऊन कोल्हापूरला गेला. दोन दिवस बस स्थानकावर राहून तिथेच स्वयंपाक करून विष्णू कामाचा शोध घेत होता. एका चांगल्या वर्क शॉप मध्ये त्याला काम मिळाले. पण पुन्हा तशाच प्रकारे फक्त जेवण आणि राहण्याच्या अटीवर. इकडे घरी न सांगता आलेल्या विष्णूवर घरातील सगळेच रागावले होते.
इकडे विष्णू वर्क शॉप मधील काम करत होता आणि संध्याकाळी बाहेर मार्केट यार्ड येथे हमाली करत होता काही पैसे भावाच्या शिक्षणाला पाठवत असे. कोल्हापूर येथे वेल्डिंग आणि इतर शिक्षण परिपूर्ण झाल्यानंतर एक वर्ष नंतर विष्णू आपल्या गावी आला. पुरेसे पैसे नसल्याने विष्णू गावातील छोट्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे जमवून त्याने एक वेल्डिंग करण्याचे मशीन घेतले. घरी छोटा उधोग उभा राहिला. आणि एक संधी अचानक विष्णूच्या जीवनात आली. अनगर येथील माजी आमदार राजन पाटील साहेब यांच्या ट्रक्टर चा डबल पलटी नांगर तुटला तो दुरुस्तीला पंढरपूरला जात होता पण विष्णूने आलेली संधी ओळखली नांगर अनगर येथेच दुरुस्त करून दिला. आमदार साहेबांनी विष्णूला बोलावले. उधोगासाठी मदत केली. गावातील रस्त्याच्या बाजूची जमीन विष्णूला उधोगासाठी दिली. शिवाय बँक स्तरावरून लागणारे भांडवल उपलब्द करून देण्याचे आश्वासन दिले. विष्णू बँकेत आला. देणा बँक ने विष्णूला सोलापूर येथील खादी ग्रामुधोग मंडळाचा पत्ता दिला. मंडळाने विष्णूची जिद्द धडाडी पाहून मार्जिन मनी या योजनेतून प्रकरण मंजूर केले. शासनाचे अनुदान आणि मदत मिळाल्याने विष्णू खुश झाला.
देणा बँक आणि खादी ग्रामुधोग यांच्या मदतीने विष्णू थिटे हा गरीब तरुणाची स्वप्ने साकार झाली. विष्णूने आपला उधोग सुरु केला. छोट्या स्वरुपात सुरु झालेला हा उधोगाने आज मोठे रुपात उभा राहिला आहे. लोकनेते ट्रक्टर नांगर, लोकनेते ट्राली असे उत्पादन सुरु झाले आहे.
विष्णूने तयार केलेले नांगर तुटत नाहीत. त्याच्या अवजारांचा दर्जा खूप चांगल असतो असे ग्राहकांचे मत आहे. त्याची उत्पादने सांगली, उस्मानाबाद,पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात जातात. अनेक शेतकरी त्याचा नांगर मिळावा यासाठी प्रतीक्षेत असतात. काल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मनराव ढोबळे, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते विष्णूच्या कारखान्याचे उद्घाटन संपन्न झाले. विष्णू आपले उधोगाचे कहाणी सांगत असताना त्याचे डोळे पाणावले होते. पण एक अश्यक्य प्राय वाटणारे स्वप्न साकार झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर लपत नव्हता.
बी. बी. जगताप
जिल्हा ग्रामुधोग अधिकारी सोलापूर